विद्येपासून जीवनार्थापर्यंतचा प्रवास
भारतीय शिक्षणपरंपरेत शिक्षण म्हणजे केवळ विद्या ग्रहण नव्हे, तर जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रक्रिया होती. माणूस अधिक माहितीपूर्ण व्हावा, यासाठी शिक्षण नव्हतं; तो अधिक उन्नत, परिपक्व आणि कृतार्थ व्हावा, यासाठी शिक्षण होतं. म्हणूनच जुन्या वाङ्मयात शिक्षणाचं अंतिम ध्येय एकच दिसतं — माणसाला वर उचलणं. शिक्षणातून विरक्ती मिळाली पाहिजे, असं आपली परंपरा ठामपणे सांगते. विरक्ती म्हणजे पलायन नव्हे, तर भोगांवर स्वामित्व. जिथे विरक्ती नाही, तिथे शरीर व्यर्थ ठरतं. आणि विरक्ती नसलेला माणूस या शरीराचा मनमानी वापर करत राहतो — आयुष्य संपेपर्यंत. आज आपण याच अवस्थेत उभे आहोत. एका युरोपीय तत्त्वचिंतकाने मानवी जीवनाचा अतिशय नेमका हिशोब मांडला आहे — तिसाव्या वर्षी माणसाला शंका येते — आपण मूर्ख आहोत. चाळीसाव्या वर्षी खात्री होते — आपण मूर्ख आहोत. पन्नासाव्या वर्षी तो स्वतःला सुधारू पाहतो. आणि साठाव्या वर्षी आपण मूर्ख होतो हे दुःख उराशी बाळगून मरतो. ही शोकांतिका घडते कारण तीस वर्षांपर्यंत माणसाच्या जीवनात कोणतंही निश्चित ध्येय नसतं. तो शरीराला जे हवं ते देतो. इंद्रियांना जे हवं ते देतो. महत्त्वाकांक्षा...