आत्मसूचना आणि वरसत् आत्मा
हा मंत्र आत्मसूचनात्मक आहे. तो आदेश देत नाही; तो आठवण करून देतो. या मंत्राद्वारे माणसाला बदलता येतं—पण बाहेरून नाही, आतून. आत्मसूचनेतून मस्तीखोर मुलालाही कसं घडवता येतं, हे श्रुती फार सुंदरपणे दाखवते.
आपण सगळेच आपल्या मुलांना सुधारू पाहतो; पण प्रश्न असतो—कशा प्रकारे?
मी नेहमी एक उदाहरण देतो. समजा एखादा मुलगा आईचं फारसं ऐकत नाही. अशा वेळी घरी पाहुणे आले आहेत आणि त्यांना लिंबाचं सरबत द्यायचं आहे. खाली जाऊन लिंबं आणायची आहेत. आईला माहीत असतं की, मुलाला थेट सांगितलं तर तो लगेच ‘नाही’ म्हणेल. मग ती काय करते? ती त्या मुलाच्या समोरच पाहुण्यांना म्हणते,
“माझा मुलगा इतका शहाणा आहे की तो आत्ताच खाली जाईल आणि लिंबं घेऊन येईल.”
हे ऐकताच तो मुलगा धावत खाली जातो आणि लिंबं घेऊन येतो.
हा प्रकार आदेशाचा नाही; तो आत्मसूचनेचा आहे. माणसातल्या श्रेष्ठतेला साद घातली की, माणूस स्वतःहून बदलतो.
श्रुतीही नेमकं हेच करते. जीवाला खाली दाबत नाही, तर वर उचलते. आत्म्याचं उन्नतीकरण हाच तिचा हेतू आहे. म्हणूनच या मंत्रात आत्म्याला अनेक विशेषणांनी संबोधलं आहे—
हंसः, शुचिषद्, वसु:, अन्तरिक्षसत्, होता:, वेदिसत्, अतिथी:, दुरोणसत्, नृषत्, वरसत्, ऋतसत्, व्योमसत्…
ही सगळी विशेषणं आत्म्याची उंची दाखवणारी आहेत.
आपण मागील वेळी नृषत् पर्यंत पाहिलं. पुढे श्रुती सांगते—आत्मा वरसत् आहे.
वरसत् म्हणजे काय?
याचा अर्थ असा की माणसाजवळ श्रेष्ठ बुद्धी आहे आणि त्या बुद्धीतच भगवंत वसतो आहे. आत्म्याचा संबंध थेट इंद्रियांशी नसून बुद्धीशी आहे. आत्मा आणि बुद्धी यांच्यात थेट नातं आहे; पण आत्मा आणि इंद्रिये यांच्यात थेट संबंध नाही.
काही गोष्टी अशा असतात की त्यांच्याशी थेट संपर्क होतच नाही. इंद्रियांना जर आत्म्याला भेटायचं असेल, तर त्या बुद्धीच्या माध्यमातूनच भेटू शकतात. जसं दारू पिऊन मोठ्या ऑफिसरला भेटता येत नाही, तशी इंद्रिये थेट आत्म्याशी जाऊन संबंध बांधू शकत नाहीत. योग्य चॅनल वापरावाच लागतो.
इंद्रियांना जे काही हवं असतं, ते थेट आत्म्यापाशी न्यायचं नसतं. आधी बुद्धीला ते मान्य आहे का, योग्य आहे का, हे तपासलं पाहिजे. बुद्धीला पटलेली गोष्टच आत्म्यापाशी जायला हवी.
आत्म्याचा बुद्धीशी थेट संबंध असला, तरी आत्म्याचा इंद्रियांशी थेट संबंध नाही. कारण आत्म्याला जगाच्या छक्केपंज्यांची माहिती नाही. आत्मा साधा आहे, सरळ आहे, निर्लेप आहे. त्यामुळे जेव्हा इंद्रिये एखाद्या वस्तूसाठी व्याकुळ होतात, तेव्हा ती आत्म्याला जाऊन म्हणतात,
“आम्ही तुमची छाया आहोत, तुमच्या अधिकारात आहोत. पण आमची वस्तू मिळाली नाही, तर आम्ही अस्वस्थ होतो.”
आणि आत्मा भोळेपणाने म्हणतो,
“असं आहे? मग जे पाहिजे असेल ते घ्या.”
पण ही इंद्रियांची व्याकुळता खरी नसते; ती अनेकदा खोटी असते. इंद्रियांना काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही, हा निर्णय बुद्धीचा असतो. जर इंद्रियांचा आत्म्याशी थेट संबंध झाला, तर सगळा घोटाळा उडतो.
म्हणूनच अध्यात्मात बुद्धीला फार मोठं महत्त्व आहे. व्यवहारात तर बुद्धी आवश्यक आहेच—पैसा कमावण्यासाठी, सांभाळण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी. पण अध्यात्मातसुद्धा बुद्धी तितकीच आवश्यक आहे. कारण इंद्रिये आणि आत्मा यांच्यातील सेतू म्हणजे बुद्धी.
आत्मा भोळा आहे, असं म्हणता येईल; पण तो अज्ञानी आहे, असं म्हणता येत नाही. श्रुतीसुद्धा आत्म्याचं संपूर्ण वर्णन करू शकलेल्या नाहीत. म्हणूनच त्या शेवटी ‘नेती नेती’ म्हणत मोकळ्या झाल्या. पण एवढं नक्की सांगतात—इंद्रिये आणि आत्मा यांचा थेट संबंध झाला, तर अधःपतन होतं; बुद्धीमार्फत संबंध झाला, तर उन्नती होते.
म्हणून वरसत् याचा अर्थ स्पष्ट आहे—
आत्मा बुद्धीमध्ये स्थित आहे.
आणि म्हणूनच अध्यात्म म्हणजे इंद्रियदमन नाही;
ते बुद्धीशुद्धीचं शास्त्र आहे.
Comments
Post a Comment