मालकी संस्था आणि क्रांती : स्वार्थाचा इतिहास आणि रूपांतराचा अभाव
मालकी संस्था ही कोणतीही नैसर्गिक घटना नाही; ती मानवी मनोवृत्तीची सामाजिक रचना आहे. माणसाच्या “हे माझं” या भावनेतून मालकीचा जन्म होतो. ही भावना जेव्हा वैयक्तिक पातळीवर राहते, तेव्हा ती साधी गरज असते; पण तीच भावना जेव्हा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक रचनेत उतरते, तेव्हा ती संस्था बनते—आणि संस्था बनली की सत्तेचा जन्म होतो.
इतिहास सांगतो की, ज्या-ज्या वेळी मालकी संस्था असह्य झाल्या, त्या-त्या वेळी क्रांती घडली. राजेशाहीविरुद्ध क्रांती झाली, सरंजामशाहीविरुद्ध उठाव झाले, भांडवलशाहीविरुद्ध साम्यवाद उभा राहिला. पण प्रत्येक वेळी एकच गूढ वास्तव समोर आले—
मालकी संस्था मोडली, पण मालकीभाव मोडला नाही.
लेनिनच्या क्रांतीत राजेशाही उद्ध्वस्त झाली; पण सत्तेचा केंद्रीकरणाचा भाव नष्ट झाला नाही. मालकीची भाषा बदलली—खाजगीऐवजी ‘राज्याची’ झाली—पण स्वामित्वाची मानसिकता तशीच राहिली. म्हणूनच जुनी सरंजामशाही गेली, पण नव्या स्वरूपात पुन्हा उभी राहिली.
इथे एक मूलभूत प्रश्न उभा राहतो :
क्रांती ही संस्थेविरुद्ध होती की वृत्तीविरुद्ध?
बहुतेक क्रांती संस्था बदलतात, वृत्ती नाही. कारण क्रांतीत सहभागी होणारा माणूस अन्यायाविरुद्ध उभा राहतो, पण स्वतःच्या स्वार्थाविरुद्ध नाही. दुसऱ्याची मालकी चूक वाटते; स्वतःची मालकी नैसर्गिक वाटते. हा दुहेरी निकषच क्रांतीला अपूर्ण ठेवतो.
गांधीजींनी या अपूर्णतेची जाणीव फार लवकर केली होती. म्हणूनच त्यांनी राजकीय स्वातंत्र्याइतकेच अपरिग्रह महत्त्वाचा मानला. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य म्हणजे सत्ता हस्तांतर नव्हे, तर स्व-स्वामित्वाचा त्याग होता. पण समाजाने स्वातंत्र्य स्वीकारले; त्याग स्वीकारला नाही. त्यामुळे ब्रिटिश सत्ता गेली, पण मालकी संस्था अधिक व्यापक आणि अधिक सूक्ष्म स्वरूपात वाढली.
खरे तर मालकी संस्था बाहेर उभी राहण्याआधी आत तयार होते. उपनिषद ज्याला अहं म्हणतात, तोच अहं सामाजिक पातळीवर मालकी बनतो. म्हणूनच बाह्य क्रांतीने अहं नष्ट होत नाही. अहं नष्ट न होता झालेली क्रांती ही केवळ सत्तांतर असते.
याच ठिकाणी ‘होता’ ही संकल्पना महत्त्वाची ठरते. होता म्हणजे जो हवन करतो. पण खरा होता तो नाही जो राजेशाहीचे, भांडवलशाहीचे किंवा दुसऱ्याच्या अन्यायाचे हवन करतो; खरा होता तो आहे—जो स्वतःच्या मालकीभावाचे हवन करतो.
जोपर्यंत माणूस स्वतःच्या “हे माझं” या आग्रहाला पवित्र मानतो, तोपर्यंत कोणतीही क्रांती अपूर्णच राहणार. कारण मालकी संस्था ही बाह्य रचना असली, तरी तिचं इंधन आतून मिळत असतं.
म्हणून इतिहास वारंवार सिद्ध करतो—
क्रांती शक्य आहे,
सत्ता बदल शक्य आहे,
पण वृत्ती बदल हा दुर्मिळ आहे.
आणि म्हणूनच खरा प्रश्न असा नाही की मालकी संस्था कधी नष्ट होतील?
खरा प्रश्न असा आहे की माणूस कधी स्वतःच्या मालकीभावाचा त्याग करेल?
तो दिवस आला, तर क्रांतीची गरज उरणार नाही.
तोपर्यंत प्रत्येक क्रांती ही नव्या मालकी संस्थेची प्रस्तावना ठरेल.
Comments
Post a Comment