वसुरूपता
जीवनात साफल्याबरोबर वैफल्यही आवश्यक आहे. वैफल्य आलं नाही तर जीवनात शक्ती येत नाही. साफल्यात सत्कारासाठी उत्तेजन मिळतं, पण वैफल्यात सत्कारासाठी दृढता आणि भक्कमपणा मिळतो. माणूस खऱ्या अर्थाने पुढचं पाऊल वैफल्यातच टाकतो; साफल्यात नाही.
वैफल्यात ठाम उभं राहण्यासाठी जबरदस्त ताकद लागते. सॉक्रेटिसकडे लोखंडी हृदय होतं म्हणूनच तो संपूर्ण विश्वाच्या विरोधात एकटा उभा राहू शकला. सॉक्रेटिस, रॉजर बेकन, गॅलिलिओ, मार्टिन ल्युथर—हे सारे असामान्य धैर्याचे लोक होते. त्यांनी पूर्ण जगाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत दाखवली.
जीवनात साफल्य आहे, वैफल्य आहे; पौरुष आहे, भिरुता आहे. त्याचप्रमाणे कर्ममयता, वेग, अवेग, सुरूपता, कुरूपता, उदारता, कार्पण्य—या सर्वांचा मिळूनच जीवनाचा पूर्ण पट तयार होतो. आणि या साऱ्या संघर्षांचा आधार म्हणजे आत्मा. म्हणूनच आत्म्याला वसु:—आधार—म्हटलं आहे.
म्हणून जीवनातील सर्व संघर्षांचा आधार “मी” आहे अशी हिम्मत उभी केली पाहिजे. या संघर्षांवर मलाच विजय मिळवला पाहिजे. त्यांना माझ्या कह्यात ठेवलं पाहिजे.
आत्म्याची वसुरूपता आणणं हे अतिशय कठीण काम आहे. वैदिक तत्त्वज्ञान मात्र तेच शिकवतं. जीवनात थोडासा संघर्ष आला तरी आपण घाबरतो. आपल्याला शरीराचं सौंदर्य हवं असतं, पण मनाचं सौंदर्यही तितकंच आवश्यक आहे. जसं सौंदर्य अपेक्षित आहे, तशी कुरूपताही अपेक्षित आहे. जसं करुणा आवश्यक आहे, तसाच द्वेषही आवश्यक आहे—आणि तोही तीव्रतम.
हा द्वेष नसता तर रामायण आणि महाभारत उभीच राहिली नसती. श्रीकृष्णाच्या अंतःकरणातही तीव्र द्वेष होता—दुष्प्रवृत्ती पृथ्वीवर राहू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यामागे होती. रामाच्या अंतःकरणात द्वेष नसता तर राम–रावण युद्ध घडलंच नसतं.
मात्र इथे एक महत्त्वाचा भेद आहे—हा द्वेष स्वार्थातून जन्मलेला आहे की नीती, संस्कृती आणि अध्यात्मिक मूल्यांच्या रक्षणासाठी उभा राहिलेला आहे, हे तपासलं पाहिजे. ऋषी-मुनींच्या अंतःकरणातही द्वेष दिसतो; पण त्या द्वेषामागे कधीही स्वार्थ नसतो.
जशी विद्वत्ता आवश्यक आहे, तशीच मूढताही आवश्यक आहे. कितीही विद्वान असलात तरी जीवनात कुठेतरी मूढ व्हावंच लागतं—आणि त्यात एक वेगळीच गंमत आहे. एखादा विद्वान तत्त्वज्ञानावर महानिबंध लिहितो; पण त्याच्यासमोर पाच वर्षांचं मूल आलं की त्याला मूढतेचा झगा चढवावाच लागतो. तो झगा न घातला तर तो त्या मुलासोबत बसूच शकणार नाही.
जीवन समजणं अतिशय कठीण आहे. जीवनातील विविध संघर्षांचा आधार “मी” आहे—हीच वसुरूपता आहे.
जगात विपुल वाङ्मय आहे; पण आत्म्याची वसुरूपता वैदिक वाङ्मयाने ज्या खोलवर समजावली आहे, तशी मांडणी अन्यत्र क्वचितच आढळते. वेदव्यासांनी हे महान कार्य केलं. जीवनातील संघर्षांत अज्ञान कसं उभं राहतं, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी संपूर्ण जीवन उलगडून सांगितलं.
वेद आणि व्यास एकत्र आले—आणि वेदव्यास घडले.
Comments
Post a Comment