एकच विचार जीवन बदलून टाकतो
अंतरातला आत्मा शुद्ध झाला पाहिजे. तो सतत हवन करीत असतो; म्हणून त्याला होता म्हटले आहे. आत्मशक्तीच्या या हवनामुळेच माणूस चालतो, फिरतो, खातो, पितो, बसतो, उठतो. माणसाची प्रत्येक कृती त्या आत्मशक्तीच्या अखंड यज्ञातूनच घडत असते. संपूर्ण जीवन अंतरातल्या चिन्मय शक्तीमुळे चालू असते.
अभ्यासू माणसाला हे ठाऊक असते की, मानवमात्राचे जीवन आत्मशक्तीच्या हवनावरच आधारलेले आहे. हे समजून घेण्यासाठी बाहेर फार धावपळ करण्याची गरज नाही. आपण कसे बोलतो, बोलताना किती शक्ती वापरतो, हे आपल्याला ठाऊक आहे का? आपण चालतो—पण चालणे म्हणजे काय, हेच आपल्याला माहीत नाही. भावना म्हणजे काय, त्यांची प्रक्रिया काय—याचीही आपल्याला नीट जाणीव नसते.
तरीसुद्धा आपण चालतो, धावतो, फिरतो. खाल्लेलं अन्न पचतं. स्वादुपिंडातून इन्सुलिन तयार होतं. अंतरातल्या असंख्य क्रिया अत्यंत शिस्तबद्ध रीतीने चालू असतात. शरीरातील अनंत नसा आपापलं कार्य करीत असतात. या नसांना जर एका सरळ रेषेत मांडलं, तर त्या कित्येक मैल लांब पसरतील. हे सगळं इतकं अचूक आणि सुरळीत चालतं—पण त्याची जाणीव माणसाला नसते.
हे सगळं आत्मशक्तीच्या हवनामुळे चालतं. म्हणून माणसाने जीवनात हवन करायला शिकलं पाहिजे—बाहेरचं नव्हे, तर अंतरातलं.
आपण भगवंताच्या पाया पडतो, त्याचं खरं कारण हेच असतं की आधी आपण त्याच्याकडून दान घेतलेलं असतं. भगवंताच्या शक्तीच्या प्रेरणेमुळे आपण सकाळी उठतो आणि मग देवाच्या पाया पडतो. त्यामुळे “भगवंताच्या पाया पडल्यानंतर भगवंत भेटतो” असं म्हणणं योग्य नाही.
काही लोक म्हणतात, “नामस्मरण करा म्हणजे भगवंत मिळेल.” पण खरा प्रश्न असा आहे की, नामस्मरण घडतं तरी कोणत्या शक्तीमुळे? मी माझ्या स्वतंत्र शक्तीने नामस्मरण करू शकतो काय? जे नाम माझ्या मुखात येतं, ती शक्ती तरी कुठून येते? तेही मुळात भगवंताच्या शक्तीमुळेच.
Comments
Post a Comment