ईश्वरसन्मुखतेचं जीवन — चैतन्याचा मार्ग
खरी गोष्ट अशी आहे की, माणसाचं मरण शरीराच्या नाशात नाही, तर ईश्वरापासून तोंड फिरवण्यात आहे. ईश्वरविन्मुखता म्हणजेच मृत्यू. शरीर चालतंय, बोलतंय, खातं-पितंय, पण जर त्याच्या अंतःकरणात ईश्वराचा स्पर्श नाही, तर ते जीवन नव्हे — तो केवळ देह आहे. म्हणूनच संत म्हणतात — “देह जिवंत असला तरी चेतना नसली, तर तो मुडदाच आहे.”
ईश्वरसन्मुखता हीच खरी चैतन्यप्राप्ती आहे. ज्या क्षणी माणूस आपल्या सर्व कृती, विचार आणि संबंधांमध्ये भगवंताचं दर्शन घ्यायला शिकतो, त्या क्षणी त्याच्या जीवनात नवं तेज उतरू लागतं. तेव्हा प्रत्येक वस्तू, प्रत्येक माणूस, प्रत्येक क्षण — हे सर्व सजीव, अर्थपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण होतात.
जगात आपण ज्या नात्यांमध्ये जगतो, त्या नात्यांचा पाया जर ईश्वराशी असलेल्या संबंधावर आधारित नसेल, तर ती नाती क्षणभंगुर ठरतात.
पती-पत्नीचा संबंध घ्या — केवळ भौतिक सुखासाठी एकत्र आलेले दोन देह हे ‘पती-पत्नी’ होत नाहीत. पत्नी हा शब्दच सांगतो — “पत्युर्नो यज्ञसंयोगेन” — म्हणजे जी यज्ञात, सत्कर्मात, धर्मकार्यात पतीला साथ देते तीच खरी पत्नी. अन्यथा तो संबंध देहाच्या मर्यादेत राहतो, आत्म्याच्या नव्हे.
अशीच व्याख्या संतानाचीही आहे — “सम्यक् तन्नोती इति सन्तानः” — जो आपल्या जीवनातील तत्त्व, धर्म, आणि आदर्श यांचा विस्तार करतो, तोच खरा पुत्र. देहाने जन्मलेलं मूल जर आत्म्याशी जोडलेलं नसेल, तर ते जीवनात विस्तार घडवत नाही, उलट अंधार वाढवतं.
ईश्वरविन्मुखता म्हणजे जडत्व, आणि ईश्वरसन्मुखता म्हणजे चैतन्य.
जेव्हा आपण ‘मी’पण विसरतो आणि ‘तो’ — ईश्वर — या भावात जगतो, तेव्हा आपल्या प्रत्येक कृतीत एक ओज येतं, प्रत्येक नात्यात पवित्रता येते आणि प्रत्येक दुःखातही एक गूढ शांती येते.
जगणं तेव्हाच सौंदर्यपूर्ण होतं, जेव्हा ते भगवंताच्या दिशेने वाहतं.
ईश्वरसन्मुखतेचा मार्ग म्हणजे चैतन्याचा मार्ग.
मग मृत्यू उरतच नाही — कारण जो ईश्वराशी जोडलेला आहे, तो कधीच मरणार नाही.
Comments
Post a Comment