संत संगाचा अमृतानुभव
संतांची तेजस्विता आणि शीतलता
संत हे जीवनातील अनोखे चमत्कार आहेत. ते जरी अग्नीसारखे तेजस्वी असले तरी त्यांचा अर्थ 'जाळणं' किंवा 'शाप देणं' असा नाही. उलट ते तर सर्वांना जवळ ओढून घेणारे, करुणेने अंगभर उब देणारे असतात. पण समाजात काहींना वाटतं — "बुवा रागावले तर शाप देतील!" अशा भीतीमुळे काही लोक दूरूनच नमस्कार करतात. असा नमस्कार म्हणजे प्रत्यक्षात "तू तिथेच राहा, जवळ येऊ नकोस" हा अप्रत्यक्ष संदेश ठरतो.
खरे संत मात्र अतिशय साधे, सामान्यातले सामान्य असतात. ते अग्नीप्रमाणे कार्य करतात —
अग्नी जसा असत् वस्तू जाळतो आणि सत् वस्तू शिजवून पोषण करतो, तसाच संतांचा प्रभाव असतो. जर एखाद्याच्या जीवनात उदासीनता, निर्जीवता, अगतिकता किंवा पापाचं सावट असेल, तर संत त्या गोष्टी जाळून टाकतात. संतांच्या सान्निध्यात गेल्यावरही जर आपल्यात निर्जीवता टिकून राहिली तर समजावं — किंवा आपल्या जाण्यात काही त्रुटी आहे, नाहीतर त्या संतात काही दोष असावा.
याचं उदाहरण म्हणजे गंजलेलं लोखंड. परीसाचा स्पर्श झाला तरी गंज निघाल्याशिवाय सोनं होत नाही. तसंच साधकाने आधी स्वतःला घासून झळाळतं करायला हवं, तेव्हाच संतांचा सान्निध्य त्याला खऱ्या अर्थाने परिवर्तन देतो.
"काशीमरणानमुक्ती" असं म्हणतात — काशीला मरण आलं की मुक्ती मिळते. पण त्यासाठी काशीला जावं लागतं. काही लोक तिथे मृत्यूच्या प्रतीक्षेलाच बसतात; आणि शेवटी परत आल्यावर दोन-तीन दिवसांतच प्राण सोडतात. मग खरंच मुक्ती काशीमध्ये आहे का? तसंच हिमालयाची यात्रा — ती दैवी आहे पण खर्चिक आणि दुर्गम. तेथे जाऊनही कोणाला भगवान शंकर प्रत्यक्ष दिसलेत का? कारण डोळ्यांवर ‘चष्मा’ चढलेला असेल तर तिथेही अंधारच. हिमालयाची गंगा अतिशय पवित्र आहे, तिचं स्नान अदृष्ट फळ देतं.
परंतु संतांचा सहवास याहूनही श्रेष्ठ आहे. संतांच्या सान्निध्यात इहलोकीही फळ मिळतं आणि परलोकीही. म्हणून गंगा, काशी, हिमालय यांच्यापेक्षा पवित्र, श्रेष्ठ आणि सुलभ असे संतच आहेत.
Comments
Post a Comment