जगात सत्याचाच विजय!
समाजात काही सांस्कृतिक लोक असतात. सांस्कृतिक म्हणजे भगवंताशी चोवीस तास जोडलेले नसले तरी ज्यांची भगवंताशी जोडले जाण्याची इच्छा आहे असे. त्या लोकांच्या दृष्टीने सत्यमेव जयते नानृतम्- या जगात सत्याचाच विजय होतो. व्यावहारिक भाषेत खरे बोलणे हे सत्य समजले जाते. परंतु वस्तुतः सत् चे जे आहे ते सत्य.
भगवान श्रीकृष्णाने हेच समजावले आहे. दुर्योधन, दूषासनासारखे लोक चार दिवस नाचतील, बंगले बांधतील म्हणून त्यांची संस्कृती विजयी झाली असे समजण्याची गरज नाही. ज्यांच्या हाती सत्ता आणि संपत्ती असते अशा लोकांचा ढोल वाजवत बसणारे लोक क्षुद्र आणि पामर आहेत. सत्ता आणि संपत्ती ज्यांच्या हाती आहे अशा लोकांच्या संस्कृतीचे भगवंताचा विचार मानत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. नाहीतर काळाच्या प्रवाहत ते टिकणार नाहीत आणि त्यांची संस्कृती खलास होईल. काही वेळा अज्ञान विजयी झाल्यासारखे दिसते पण सत्याने हे जग निर्माण केले आहे आणि सत्य त्यात येऊन बसले आहे त्यामुळे अंतिम विजय ज्ञानाचाच होणार, अज्ञानाचा नाही. नैतिक लोकांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर जगात सत्याला मूल्य आहे, व असत्याला कधीही मूल्य येणार नाही. काही लोक म्हणतात की जमाना बदलला आहे. विसाव्या शतकात वाईट गोष्टींचा बोलबाला आहे. वाईट गोष्टींना चांगले आणि अनितीला निती ठरवण्यात येते. लोकांना भीती आहे की लोक अनितीलाच नीति समजतील. पण भिण्याचे कारण नाही. अनिती कधी नीती बनणार नाही. सत्यालाच मूल्य आहे.
Comments
Post a Comment