विकसित जीवन
विकसित जीवन
जगातील सर्वच पदार्थ, जड वस्तू पण उत्क्रांत होऊन विकसित होतात, दुसऱ्याचे जीवन सुखी बनवतात. फक्त माणूसच निरोपयोगी आहे! सांगण्याचे तात्पर्य, 'मी माणूस आहे' हेच जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत 'मी ब्रह्म आहे' हे कुठून सिद्ध होणार? म्हणून गीता स्पष्ट समजावते, की माझ्या रस्त्याने चालतो तो माणूस. दैवी संपत्तीचे जीवन जगणे हाच प्रभूचा रस्ता आहे आणि दुसऱ्याचे जीवन दैवी संपत्ती युक्त बनवणे हे भगवंताचे काम आहे आणि भगवंताचे काम जो करतो तोच माणूस आहे.
आज जगात दैवी संपत्तीची उपेक्षा होते आहे. आणि माणसांची सर्व शक्ती असुरी वृत्ती वाढवण्यात खर्ची पडते आहे. प्रभूच्या रस्त्याने जाणे म्हणजे श्रुती सांगते त्याप्रमाणे जे प्राणतत्व आहे त्याला ब्रह्म समजून त्यांची उपासना करायची. त्याला ब्रह्म समज आणि हा प्राण ब्रह्माच्या रस्त्याने जाऊ लागेल तेव्हा तो ब्रह्म होईल. त्याला ब्रह्म समजून प्राणाची उपासना केली पाहिजे.
प्राणाची उन्नती होतेच. झुरळापासून एक एक स्थिती बदलत जाते. उन्नत होत होत जीव माणूस झाला, त्याला बुद्धी दिली, कर्तुत्व दिले. माणूस झाल्यावरच कर्तुत्व दिले आहे. त्याचा उपयोग करून माणूस भगवंताच्या रस्त्याने जाऊ शकतो. दैवी संपत्ती युक्त बनणे दैवी संपत्तीयुक्ताचे रक्षण करणे हा प्रभूचा रस्ता आहे. दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करणे आणि त्यागमय, प्रेममय जीवन जगून स्वतःचे जीवन विकसित करत करत दुसऱ्याचे जीवनही विकसित करणे हाच मानवी जीवनाचा अर्थ आहे.
माणूस, प्राणाला पशुतत्त्वावर न आणता मनुष्य तत्त्वावर घेऊन जाईल आणि तिथपर्यंत पोहोचलेला प्राण देवतत्त्वावर जाईल त्यालाच उत्क्रांत झालेला जीव म्हणतात. त्यालाच म्हणतात प्राणब्रह्माची उपासना.
Comments
Post a Comment