संपूर्ण जग चालवणारा भगवंत मला पाहिजे.
तुज आहे तुझ्यापाशी
एखादा ईश्वर भक्त येतो आणि हळूच विचारतो, 'अरे बाबा! तू पूजा का करतोस? तेव्हा तो म्हणतो, 'काय सांगू? आज पर्यंत इतके लोक माझी पूजा पाहत आहेत. कोणी मला भगत म्हणून हाक मारतात, कोणी वैष्णव म्हणून हाक मारतात, पण मला कोणी असे विचारत नाही की मी पूजा कशाकरता करतो आहे? कोणाला वाटते की हे मी नोकरीसाठी करत असेन, कोणाला वाटते मुलासाठी करत असेन, तर कोणाला वाटते की मेल्यानंतर स्वर्ग- पुण्य मिळावे म्हणून पूजा करत असेन. पण तू आज मला विचारलेस! मी मोकळ्या मनाने तुला सांगतो की मला पैसा नको, मला कीर्ती नको. मला मुक्ती, धनसंपदा... काही काहीच नको. हा जगदाधार जगदीश, की ज्याच्या आधारे हे संपूर्ण जग चालते आहे तो असा लपून का बसला आहे? मला त्याला पाहायचा आहे. यासाठीच हा माझा आटापिटा चालू आहे.'
तेव्हा ईश्वरभक्त म्हणतो, 'असं! यासाठी तू इतकी धावपळ करतो आहेस? यासाठी तू नामजप करतो आहेस? तुला असे वाटते का की भगवंताचा नामजप केल्याने भगवंत मिळेल? हा तुझा मूर्खपणा आहे. तू ज्या शक्तीने नामजप करतो आहेस ती शक्तीच भगवंत होय.' नाम घेतल्यानंतर नव्हे तर नाम घेऊन जो येतो तो नामदेव. नाम घेतल्यानंतर देव मिळतो अशी जर तुझी कल्पना असेल तर तू तुझ्या शक्तीने नाम घेतोस हे नक्की होईल. तुकाराम महाराज म्हणतात : आपुलिया बळे नाही बोलवत. तुझ्या शक्तीने तू बोलू देखील शकत नाहीस, तुझा जो जप चालला आहे तो भागवद् शक्तीने चालला आहे. तर मग भगवंताला दुसरीकडे शोधायला कुठे निघाला आहेस?
Comments
Post a Comment