भगवंताला सापडण्यासाठी माणसाची चुकीच्या मार्गाने चाललेली धडपड.
कंदील तर तुझ्या हातातच
माणसे भगवंताला शोधायला घर सोडतात, पत्नीला सोडतात, मुलाबाळांना सोडतात, सर्व सोडतात. हे सगळे सोडल्याशिवाय भगवंत मिळत नाही असे मानून सगळे सोडतात आणि मग संन्यास घेतात. काम्यानां कर्मणा न्यासम्| तो भगवी वस्त्र नेसतो. भगवे नेसलेला माणूस पाहिला की लोक पुर्वी समजून चालायचे की याला काहीच नकोय. हा फक्त भगवंताला शोधायला निघाला आहे . पण याच्या इतका दुःखी माणूस जगात दुसरा कोण असेल.
ज्या शक्तीच्या योगे तुझे पाय चालतात तीच भगवान होय, तर मग तू भगवंताला शोधायला कुठे निघालास? तुझ्यासोबतच भगवंत आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी| तुझे तर तुझ्या जवळच आहे तू शोधायला कुठे निघालास? कंदील तर तुझ्या हातातच आहे; तू तो कुठे शोधतो आहेस?
पूजा-अर्चा वगैरे करत असू तर शेकडो लोक येतात आणि जातात. 'भगत' म्हणून हाक मारतात. कोणाला वाटते की हा काय मागतो आहे. पण प्रत्यक्षात माणसाच्या अंत:करणात मागणी एकच असते की हे सुंदर जग बनवणारा शामसुंदर, प्रभू किती सुंदर असेल! त्याला शोधायचं आहे. सदवर्तनाने आणि धार्मिक आचणाने जीव ईश्वराच्या जवळ येऊ लागतो. परंतु जवळ येऊनही भगवान कुठे आहे ते त्याला कळत नाही. म्हणून त्रंबकेश्वर, हरिद्वार, काशी, रामेश्वरला जातो. कोणी म्हणतो पशुपतिनाथला भेटेल, म्हणून पशुपतिनाथला जातो. कोणी म्हणतो अमरनाथला भेटेल, तर अमरनाथला जातो. ठीकठिकाणी धावपळ करत असतो. त्याला असे वाटते की मी सदाचरणी झालो, धार्मीक बनलो तरीही अजून हा चिदंबर जगदीश लपून का राहिला आहे? आहे कुठे तो? भगवंत मला बघायला का मिळत नाही? अशी तीव्रतम इच्छा झाली की त्याला कळते की ईश्वर माझ्यासोबतच आहे. चोवीस तास माझ्यासोबत आहे. तुझे तुझ्यापाशीच आहे. तू ज्या शक्तीने बोलतोस, तु ज्या शक्तीने चालतोस ती शक्ती म्हणजेच भगवान. तो तुझ्या सोबतच आहे. ही सगळी धावपळ कशासाठी करतो आहेस?
Comments
Post a Comment