भारतीय लोकांत ध्येयपूजा असली पाहिजे.
ध्येयपूजा
आपल्या देशात लोकांनी ध्येयपूजा केली आहे. जीवनात काही ध्येय बाळगून जगले आहेत. ज्यांना ध्येयाची कल्पनाच नाही ते लोक असा युक्तिवाद करतात की विसाव्या शतकात असे मोठे ध्येय बाळगून जीवनात यशस्वी होता येत नाही. परंतु आपण यशस्वी होण्याचा विचारच कशासाठी करायचा? तुम्ही एकदा मनापासून प्रेम तर करा, मग भले ते अयशस्वी ठरो. पण ज्याने जीवनात खरे प्रेमच केले नाही त्याला प्रेम करण्याचा जो आनंद आहे तो कसा कळणार? जीवनात यशस्वी होऊ किंवा अयशस्वी होऊ त्याची तमा न बाळगता जीवनात ध्येय बाळगा. ध्येयाला यशस्वी करायचं की नाही ते भगवंतावर सोडून द्या. अवघाची संसार सुखाचा करीन असे म्हणणारे कित्येक भागवत भक्त होऊन गेलेत. त्याच्यातील एकाचे तरी ते स्वप्न खरोखर साकार झाले आहे? म्हणजे त्याचा अर्थ असा नव्हे की ते ध्येय निरर्थक होते. ध्येयनिष्ठ जीवन जगणे हे दैवी जीवन आहे. रात्रंदिवस माणसाला या ध्येयाची स्वप्न पडली पाहिजेत. 'मला हे करायचं आहे' हा जीवनाचा निर्धार असला पाहिजे. 'होईल तर पाहू... किंवा 'जमले तर करू' असे बोलणाऱ्याचे जीवन आळणी आहे.
Comments
Post a Comment