सागर पूजन - नारळी पौर्णिमेची तयारी.

सागर पूजन 

सर्व नद्यांची सर्व शक्ती मिळाली तरी सागर बिघडत नाही, उन्मत्त बनत नाही, स्वतःच्या मर्यादाचे उल्लंघन करीत नाही. चार पैसे मिळतात उन्मत बनून कुळाची, समाजाची, राष्ट्राची, धर्माची किंवा संस्कृतीची मर्यादा जुगारून देण्यास उद्युक्त होणाऱ्या दंगेखोर मानवाला सागराची ही नम्रता आगळे जीवनदर्शन घडवते. जशी मित्राची परीक्षा आपत्तीत होते, वीराची परीक्षा रणांगणात होते तशी व्यापाऱ्याची परीक्षा संपत्तीमध्ये होते. वैभव वाढताच जो विश्वेश्वरापासून विमुख होत नाही, वैभव हे प्रभू प्रसाद आहे; असे जो समजतो तोच व्यापारी संपत्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण होतो. जनक असेच एक वैभवशाली विभूती होते.
  
खारा पण 'गोड' समुद्र चंद्राला पाहून वेडा होतो. समुद्र पूजन करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही विचार केला पाहिजे की, ज्याला पाहून वेडेपिसे व्हायला होते अशा संताला आपल्या जीवनात स्थान आहे की नाही? चंद्राला पाहून सागर जसा उचंबळून येतो तसा एखाद्या महापुरुषाचा मुख चंद्रमा पाहून आपल्या हृदय सागरालाही भरती आली पाहिजे. चंद्र ज्याच्याकडून प्रकाश घेतो त्या सूर्याला सागर स्वतःची संपत्ती देतो. सूर्यार्पण केल्याने त्याचा खारेपणा निघून जातो व बरसणारे पावसाचे पाणी सुमधुर लागते. व्यापाऱ्यांनी देखील संत ज्याचे कार्य करीत राहिले आहेत, ज्याच्यापासून प्रकाश व प्रेरणा प्राप्त करतात अशा प्रभूला स्वतःची संपत्ती अर्पण केली पाहिजे. तरच त्यांच्या जीवनातील खारटपणा नाहीसा होईल.
    
वेदनिष्ठा व वेद रक्षण यांच्या प्रतिज्ञांची आठवण देणारा, ध्येयाचे स्मरण करणारा, भावजीवन पुष्ट बनवणारा, संपत्ती ईश्वरा अर्पण करायला सुचविणारा, श्रावण पौर्णिमेचा हा उत्सव भारतीय जनते करिता गौरवाचे स्थान आहे. वेदनिष्ठेने सृष्टीचे संस्कार स्वास्थ्य टिकविणारा, रक्षाबंधनाने समाजाचे भावबंधन पुष्ट करणारा तसाच सागर पूजेने वैयक्तिक जीवनाच्या महानतेच्या शिखराचे दर्शन करविणारा त्रिवेणी संगमासमान असलेला हा उत्सव आपल्याला पावन करून हीच प्रार्थना!

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन