करन्सी - अर्थव्यवस्था चालवण्यासाठी असलेले चलन.
जिथे जायचे आहे ज्या देशात तिकडची करन्सी घेऊनच जावे लागते! आज आपल्याला दुसऱ्या देशात जायचे असेल तर तिथली करन्सी असणे आवश्यक आहे. इथली करन्सी तिथे चालत नाही. त्याचप्रमाणे आपल्या इथल्या कामांना सत्कार्मात, पुण्यकर्मात बदलले पाहिजे, ट्रान्सफर केले पाहिजे.
ज्या देशात जातो त्या देशाची करन्सी आपल्या जवळ असली पाहिजे. इथल्या बँकेत तुमचे करोडो रुपये असतील पण तिकडची करन्सी नसेल तर काही उपयोग होत नाही. तिकडच्या करन्सीत ते एक्सचेंज व्हायला हवेत, बदलायला हवेत. आणि एक्सचेंजची सूट कोणाला मिळते? जो तिकडच्या शेठजीचे काम करतो त्यांना एक्सचेंज मिळते. भगवंताकडे तर केवळ आपण केलेल्या कर्माचे गाठोडेच बरोबर येणार आहे.
धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे
भार्या गृहव्दारि जन:श्मशाने |
देहश्चितायां परलोकमार्गे
कर्मानुगो गच्छति जीव एक:||
इकडच्या करोडपतीला देखील सगळी संपत्ती इथेच ठेवून जावे लागते. अंत्येष्टी संस्कार करतेवेळी चितेत एक दीडकि टाकायचा विधी आहे. त्यावेळी भटजी स्वतःच्या कणवटीची दिडकी काढून तिथे टाकतो. मरतेवेळी त्याची दीडकु पण येत नाही हे केवढे दुःखदायक आहे! घर बंगला.. त्यासाठी सगळा जन्म घालवला तेच सर्व इथेच टाकून जायचे. ती सगळी इकडची करन्सी आहे, वरच्या करन्सीसाठी तर केवळ कर्माची शिदोरी सोबत येणार. ती शिदोरी सोबत येण्यासाठी कुशल पाहिजेच.
थोडक्यात, माणसाने इहजन्माचे, पुढे येणाऱ्या जन्माचे कुशल पाहायचे आणि मेल्यानंतरचे कुशल पाहायचे आहे. तुझा भूतकाळ उज्वल असेल तर भविष्यकाळ उज्वल होईल. असे काम कर की ज्यामुळे वर गेल्यावर भगवंताला वाटावे की खरोखरच हा माझा मुलगा व्हायला योग्य आहे.
Comments
Post a Comment