आत्मीयता - समाजशीलतेपेक्षा समान शील पाहिजे
आत्मीयता
गावात एकवाक्यता हवी असेल तर ह्या रीतीने स्वाध्याय झालाच पाहिजे. समाजशील माणूस तयार करण्याचा एकमेव रस्ता म्हणजे स्वाध्याय आहे. समाजशीलतेसाठी समानशीलता असणे गरजेचे आहे.
सृष्टीत सत्व, रज, तम ही त्रिगुणात्मक प्रकृती असल्यामुळे समाजात विषमता तर राहणारच. गावात म्हातारा पण असणार आणि तरुणही असणार. त्यांच्या शक्तीत फरक तर असणारच. जिथे विषमता असेल तिथे ऐक्य मैत्री कशी काय संभावणार?
एक पुष्ट आणि दुसरा अपुष्ट असेल, दुर्बल असेल तर त्यांची मैत्री होत नाही. लग्न किंवा मैत्रीमध्ये समान वित्त तसेच समान गुण असले पाहिजे हे व्यवहारिक सत्य आहे. पण आपल्या शास्त्रकाराने समजावले एक चांगली गोष्ट सांगितली आहे. जिथे प्रेम असेल तिथे विषमता राहणार नाही.
मुलगा आणि बाप या दोघात कोणत्या दृष्टीने समानता आहे? वय, शिक्षण, पैसा, शक्ती, जीवन की अनुभव इत्यादी कोणत्याच बाबतीत त्यांच्यात समानता नाही. सर्व बाबतीत विषमताच आहे. तरीही त्यांच्यात प्रेम आहे, कारण तिथे आत्मीयता असते तेव्हा समाजशीलता आणण्यास समाजात आत्मीयता निर्माण करावी लागेल.
आत्मीयता निर्माण केव्हा होईल? आपण सारे एकाच भगवंताची लेकरे आहोत ही भावना जोपासली तर, आपण एकाच पित्याची संतान आहोत ह्या भावनेने स्वाध्याय होईल तर मग आत्मीयता आपसूक येईल.
सद्गुणी - दुर्गुणी, गरीब- श्रीमंत, लहान -मोठा असे सर्वच एका पित्याची -भगवंताची परमपिता परमात्म्याची संतान आहोत. या भावनेने एकत्र येतील आणि स्वाध्याय करतील. बोलणारा आणि करणारे सगळेच एकत्र बसतील. तुमचा देखील स्वाध्याय आणि माझा देखील स्वाध्याय. मी बोलून स्वाध्याय करणार तुम्ही ऐकून स्वाध्याय करणार. हेच तर स्वाध्यायाचे वैशिष्ट्य आहे. इथे कोणी ऐकण्यासाठी किंवा ऐकवण्यासाठी, शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी आलेला नाही, आम्ही सर्व स्वाध्यायासाठी, एकाच प्रभूची लेकरे म्हणून एकत्र आलो आहोत.
Comments
Post a Comment