लौकिक परिवार - निजधामाचे आकर्षण
निजधामाचे आकर्षण
संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले की सर्वजण ऑफिस मधून जातात. ऑफिसमध्ये पाच मिनिटे आधीच माणूस तोंड धुऊन, कोट घालू लागतो. माझ्यासारखा कोणी विचारतो की 'अजून पाच मिनिटे वेळ आहे एवढी घाई कशासाठी?' तर म्हणतो नंतर एक मिनिटही बसायचं नाही म्हणून आधीपासूनच जाण्याची तयारी करायची.' याचा अर्थ हा की प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते.
मला माझ्या निजधामाचे आकर्षण आहे कारण तिथे प्रेमळ व्यक्ती माझी वाट पाहत बसली आहे असे वाटते. माणसाने घरी कोणाशी करार केलेला नसतो की संध्याकाळी सहा वाजता मी घरी येईन. घरात पत्नी पण कागदावर तसे लिहून घेत नाही. दोघांनाही खात्री आहे की संध्याकाळी घरी भेटायचं आहे.
संध्याकाळी सागर किनारी बसलात तर पक्षांचे थवे उत्सुकतेने स्वतःच्या घरी जाताना दिसतात. जीवणाच्या संध्याकाळी घरी जाण्याची अशी उत्सुकता असली पाहिजे. आपल्याला दुसऱ्याच्या घरी जाण्याचे उत्सुकता वाटत नाही. आपल्याला भीती वाटते की दुसऱ्याच्या घरी गेलो तर तिथे आपल्याला काय खायला, प्यायला मिळेल की नाही? आपण परलोकी गेलो तर तिथे आपली काय दशा होईल? इथे तर पाणी म्हटले की नोकर लगेच पाणी घेऊन येतो. परलोकांबद्दल तसा विश्वास नाही. कारण आपल्या आतील राम आपल्याला तसा विश्वास देत नाही. आतील रामाने आपल्या अख्ख्या जीवनाचा हिशोब करून ठेवला आहे. त्याचा हिशोब चुकीचा नसतो आणि चुकीचा ठरत नाही. परलोकीच्या अज्ञात जगात आपली सोय होईल की नाही याची भीती वाटते म्हणून आपण परलोक मानण्याचे सोडून दिले आहे!
परलोक शास्त्रीय आहे, वैज्ञानिक आहे तरीही परलोकांकडे बघण्याची आपली इच्छाच नसते. म्हणून त्याचा विचार करत नाही. पडेल तेव्हा करेन असे म्हणत होईल तोवर परलोक विसरण्याचा प्रयत्न माणूस करतो. परलोकाला असे विसरून चालणार नाही.
Comments
Post a Comment