आध्यात्मिक पातक हे कश्यास समजले जाते
आध्यात्मिक पातक
काही आध्यात्मिक पातके आहेत. व्यक्तीने निरूत्साही राहणे , आकर्मण्य असणे, निष्प्रेम, भावशून्य आणि निस्तेज असणे ही सर्व आध्यात्मिक पातके आहेत. सामाजिक पातके शिक्षणाने नाहीशी होतात. पण आध्यात्मिक पातकांचा रंग असा पक्का बसतो की निघता निघत नाही. अध्यात्मिक विकासात काही पातके अडथळा आणतात. माणसाला कामावर जायला उत्साह असतो तेवढा उत्साह स्वाध्यायात जायला नसतो. आज मन लागत नव्हते म्हणून स्वाध्यायाला गेलो नाही. पण एका दिवशी कामावर जाण्याबाबत असे होते का ? मन लागत नसले तरी कामावर जातोच आणि जावे लागतेच, कामावर जाऊन बसतोच. म्हणजे माणसापाशी उत्साहा नाही असे नाही! असे एखादे तरी काम तुम्ही स्वीकारले आहे का, की ज्याचा आज तुम्हाला काहीही फायदा नाही? मेल्यावर फायदा होतो ती गोष्ट वेगळी. 'आज मला या कामाचा काही फायदा नाही तरीही निरंतर, सतत मी ते काम करतो.' असे म्हणू शकाल?
स तू दीर्घकालनैरन्तर्य सत्कारासेवितो दृढभूमी:|
या रीतीने काम करायला योगदर्शनकार सांगतात. माणूस नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो, गरबा पण खेळतो आणि स्वतःला भागवद् भक्त समजतो. भागवत सप्ताह सात दिवस ऐकतो त्या दरम्यान दाढी पण करत नाही आणि ऐकायला बसतो. परंतु रोज भागवताचे दोन श्लोक वाचायला कोणी सांगितले तर बसायची तयारी आहे? रोज दोन श्लोक वाचून फायदा काय? ज्या प्रवृत्ती मध्ये फायदा होत नाही ते न करण्यास खूप बहाणे मिळतात. 'काय हो, स्वाध्यायाला आला नाहीत?' 'काल डोके फार दुखत होते' अस्स! तर मग ऑफिसमध्ये गेला होतात की नाही? ऑफिसमध्ये तर गेलोच होतो; कारण नाही गेलो तर पगार कापतात.' अशा लोकांना भगवान सोडणार नाही! ईश्वरी कार्यात, स्वार्थरहित कार्यात जो उत्साह टिकतो तो आध्यात्मिक उत्साह आहे
Comments
Post a Comment