एकता - भगवंताच्या दारात असलेली एकता
एकता
दुसऱ्याबरोबर एकता कशी उभी राहील? स्वाध्यायात एकत्र होऊ तेव्हा किंवा मंदिरात एकत्र येऊ तेव्हा एकता उभी होईल. एवढ्यासाठी ऋषींनी मंदिर उभे केले. मानवात सबंध प्रस्थापित करण्यासाठी मंदिर दिले. एवढ्यासाठीच मंदिर होते. पण आज मंदिरात एक माणूस आठ वाजता येतो आणि दुसरा नऊ वाजता. बारा बारा वर्षापर्यंत दोघेही लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात दर्शनाला जातात पण त्यांनी एकमेकांचे तोंड पण पाहिलेले नसते. याला काय मंदिर म्हणायचे? आपण एका भगवंताची मुले आहोत म्हणून एकत्र बसू. जिथे स्वतःच्या मुलांना एकत्र बसलेले पाहून भगवंताला गुदगुल्या होतात ते मंदिर होय. स्वतःच्या मुलांना एकत्र बसलेले पाहून भगवंताला गुदगुल्या व्हायला पाहिजे.
गावात एक वृद्ध व्यक्ती असते. तिला चार मुले आहेत. एक इंजिनिअर आहे, त्याने डॉक्टरेट केले आहे, तो मुंबईचा मॅनेजर आहे. दुसरा अहमदाबादचा शेरीफ आहे. बाकीचे दोघेही गावी शेती करतात. ते दोघे जास्त शिकलेले नाहीत. एक चार इयत्ता शिकलेला आहे व दुसरा मॅट्रिक पर्यंत शिकलेला आहे. चौघे गावातल्या घरी एकत्र जमले आहेत. सगळे भाऊ एकत्र जेवायला बसले आहेत आणि आई त्यांना जेवायला वाढते आहे. चौघा भावांना एकत्र बसून जेवताना पाहून आईला आनंद होतो. त्यांचे विचार एक नाहीत, त्यांच्या आवडीनिवडी एक नाहीत, त्यांची पत एक नाही तरी ते एकत्र का बसले? त्यांची आई एक आहे म्हणून. त्याचप्रमाणे कोणी ब्राह्मण असेल, कोणी वैशा असेल, कोणी श्रीमंत असेल, कोणी गरीब असेल, कोणी दुर्गुणी असेल, कोणी सद्गुनी असेल असे असून सुद्धा आपण बरोबर बसू तेव्हा ते पाहण्यासाठी भगवंत उंबरठ्यावर उभा असेल. सर्वांना ही कल्पना असेल की आपले आई एक आहे. जिथे 'आई'ला गुदगुल्या होतात ते मंदिर होय.
Comments
Post a Comment