पुढच्या येणाऱ्या पिढीचे भवितव्य काय ?
नीतीधर्म तात्कालीक आहे, तो आपण तोडला तर आपला नातू कुठे उभा राहील? त्याला उभे राहण्यासाठी अधिष्ठानम् तर पाहिजे, तेच नाही. भविष्याकडे आपण पाहतच नाही. आज सारे लोक स्वतः पुरतेच पाहतात. एखाद्याने विचारले, आज तुझे चांगले झाले पण उद्याचं काय? तर तो म्हणतो, 'उद्याची पिढी समर्थ आहे, आमचा उद्याच्या पिढीवर विश्वास आहे. आम्ही बिघाड केला तर उद्याची पिढी सुधार करेल' असे बोलणारा बाप आहे की कोण आहे? यानंतर येणाऱ्या पिढीचा तो विचार करत नाही. दोन तपानंतर म्हणजेच पंचवीस वर्षानंतर काय होईल? अव्यवस्थित बोलणाऱ्यांनी त्याचा विचारच केला नाही.
जो भविष्याचा विचार करीत नाही तो माणूस नाही. भूतकाळात कृतज्ञता येते, वर्तमानात भाव-प्रेम येते आणि भविष्यात गती येते. कृतज्ञता, भाव आणि गती, तिन्ही आवश्यक आहे.
माणसाला स्वतःची आणि समाजाची गती पहावी लागेल. माणूस कालाधीन आहे. आज जी भाषा आहे तिला तो जोड मारून ठेवतो. स्वतः पुरते स्वतः जोपर्यंत खुर्चीवर आहे तोपर्यंत आवाज होता कामा नये; ही जोड आहे. राजसत्ता अशी बेजबाबदार बनली आहे. पाच वर्षानंतर त्या जागी बुद्धिमान लोक येतील असे तो म्हणतो. भाषा मोठी गोड वापरतो. म्हणून तो म्हणतो, येणारी पिढी आमच्याहून अधिक बुद्धिमान असेल, हुशार असेल. ती स्वतःला सुधारू शकेल. माझ्यावर काही जबाबदारी नाही. असे बोलणाऱ्यांना पशु नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तो भविष्याचा विचारच करत नाही. आज उभ्या ठाकलेल्या समस्या तात्पुरत्या सोडवल्या, जोड लावली आणि खुर्ची पाच वर्ष टीकली. ह्या समस्या कॅन्सर सारख्या बनतील आणि मग वीस पंचवीस वर्षे लोकांना हैराण करतील. हे लोक भाषा किती सुंदर वापरतात, म्हणतात: लोक समर्थ आहेत. लोकशाहीचा अर्थच हा की ज्याचा जनतेवर विश्वास आहे. आज माणूस वीस वर्षानंतरचा विचार करून पाऊल उचलत नाही.
👌👍
ReplyDelete