विद्येपासून उपजीविकेपर्यंतचा घसरलेला प्रवास
आधुनिक शिक्षणाचं सर्वात मोठं अपयश हे नाही की ते अज्ञान निर्माण करतं;
तर त्याहून मोठं अपयश हे आहे की ते जीवनाचा अर्थच बाजूला सारतं.
आज शिक्षण म्हणजे काय,
याचं उत्तर स्पष्ट आहे —
शिक्षण म्हणजे नोकरी मिळवण्याचं साधन.
शिक्षण म्हणजे आर्थिक सुरक्षिततेची हमी.
शिक्षण म्हणजे सामाजिक प्रतिष्ठेची जिना.
पण एक मूलभूत प्रश्न
या सगळ्यात कुठेच विचारला जात नाही —
माणूस घडतोय का?
विद्या वाढते आहे,
पण विवेक वाढतो आहे का?
कौशल्य वाढतं आहे,
पण कृतार्थता वाढते आहे का?
आधुनिक शिक्षण माहिती देतं,
पण दिशा देत नाही.
त्यामुळेच आज आपल्याकडे
उच्चशिक्षित माणसं आहेत,
पण उच्चदृष्टी नाही.
ही समस्या केवळ व्यवस्थेची नाही;
ही तत्त्वज्ञानाची समस्या आहे.
कारण आधुनिक शिक्षणाचा पाया
एका गृहितकावर उभा आहे —
मानवी जीवनाचं अंतिम ध्येय सुख आहे.
सुख म्हणजे सुविधा.
सुविधा म्हणजे भोग.
आणि भोग म्हणजे यश.
या साखळीत कुठेच
कर्तव्य, त्याग, ध्येय, व्रत
यांना स्थान नाही.
म्हणूनच शिक्षणातून
विरक्ती निघून गेली.
विरक्ती म्हणजे जग सोडणं नव्हे,
तर भोगांवर अधिराज्य.
जिथे विरक्ती नाही,
तिथे देहच ध्येय बनतो.
आणि देह ध्येय बनला,
की जीवन साधन राहत नाही.
आजचा विद्यार्थी
स्वतःच्या देहाकडे
उपभोगाचं साधन म्हणून पाहतो.
झोप, अन्न, करिअर, लैंगिकता, प्रतिष्ठा —
सगळं देहाभोवती फिरतं.
पण “हा देह कशासाठी आहे?”
हा प्रश्न शिक्षण विचारतच नाही.
म्हणूनच आधुनिक शिक्षण
व्रत-विहीन स्नातक तयार करतं.
तो शिकलेला असतो,
पण ठरलेला नसतो.
त्याच्याकडे डिग्री असते,
पण दिशा नसते.
त्याच्याकडे पर्याय असतात,
पण ध्येय नसतं.
याचं परिणाम
एका युरोपीय तत्त्वचिंतकाने
उपहासाने मांडलं आहे —
तिसाव्या वर्षी शंका — आपण मूर्ख आहोत.
चाळीसाव्या वर्षी खात्री — आपण मूर्ख आहोत.
पन्नासाव्या वर्षी सुधारण्याचा प्रयत्न.
आणि साठाव्या वर्षी
आपण मूर्ख होतो
या वेदनेत मृत्यू.
ही शोकांतिका
अयोग्य बुद्धीमुळे नाही,
तर अयोग्य शिक्षणामुळे घडते.
भारतीय शिक्षणपरंपरेत
अशी विसंगती नव्हती.
इथे शिक्षणाचं ध्येय स्पष्ट होतं —
वृद्धिंगत माणूस घडवणं.
वय वाढणं अपरिहार्य आहे;
पण वृद्ध होणं ही साधना आहे.
वृद्ध म्हणजे
ज्ञानाने, ध्येयाने, प्रेमाने वाढलेला.
म्हणूनच संस्कृतीने
वृद्ध आणि म्हातारा
यात फरक केला.
आधुनिक शिक्षण
माणसाला म्हातारा करतं —
वृद्ध नाही.
कारण ते फक्त
उपजीविकेची तयारी करून देतं,
जीवनार्थाची नाही.
आपल्या शास्त्रानुसार
विद्या पूर्ण करून बाहेर पडणारा तरुण
व्रत-स्नातक असतो.
मनुस्मृती म्हणते —
“वेदविद्याव्रतस्नातक:”
विद्या + व्रत
= पूर्ण शिक्षण.
आज मात्र
विद्या आहे,
व्रत नाही.
म्हणूनच
देह भोगासाठी वापरला जातो,
अर्पणासाठी नाही.
जर लहानपणापासूनच
“देह एक साधन आहे”
ही जाणीव शिक्षणातून दिली गेली असती,
तर माणूस देह देण्यासाठी वापरला असता.
मग शिक्षण
फक्त नोकरीकडे नेणारं नसून,
निर्वाणाकडे नेणारं झालं असतं.
आणि शेवटच्या क्षणी
माणूस अग्नीदेवतेला म्हणू शकला असता —
“हे अग्नेय! तू मला रस्ता दाखव.”
भीतीने नव्हे,
रिकामेपणाने नव्हे,
तर कृतार्थतेने.
Comments
Post a Comment