श्रम, होता आणि असत्याची मुळं
श्रम तुझा नाही.
हेच पहिलं सत्य आहे.
जो म्हणतो—“मी करतो”,
तो आधीच अज्ञानात उभा आहे.
कारण करणारा तू नाहीस.
तुझ्यात बसलेला जो करतो,
तो ‘होता’ आहे.
बाप तुझा जमिनीवरचा नाही.
बाप आकाशात आहे.
आणि आकाशात असलेला बाप
तुझ्या शरीरात उतरलेला आहे.
तो श्वास घेतो.
तो चालतो.
तो श्रम करतो.
म्हणून श्रम तुझ्या मालकीचे कसे असतील?
श्रम मोजता येत नाहीत.
त्यांना किंमत लावता येत नाही.
कारण जिथे भगवान काम करतो,
तिथे बाजार कसा चालेल?
अर्थशास्त्र इथेच खोटं ठरतं.
कारण ते श्रमाला माल मानतं.
आणि श्रम करणाऱ्याला मालक.
पण श्रम करणारा भगवान असेल,
तर मालक कोण?
“मी घाम गाळतो”—
ही भाषा अज्ञानाची आहे.
घाम तुझा नाही.
श्वास तुझा नाही.
श्रम तुझा नाही.
तू फक्त देह आहेस.
होता अंतरात आहे.
म्हणून पूर्वजांनी अंश काढून ठेवला.
हवन केलं.
भाग वेगळा काढला.
कारण त्यांना माहिती होतं—
“हे माझं नाही.”
धर्मादाय म्हणजे भीक नाही.
तो कबुली आहे.
ही कबुली की—
“माझ्या नावावर जे दिसतं,
ते माझं नाही.”
भगवंत पैशासाठी थांबत नाही.
तो दृष्टी पाहतो.
तू किती दिलं याची चौकशी तो करत नाही.
तू स्वतःला किती सोडलं—
तेच तो पाहतो.
म्हणून गीता म्हणते—
पत्र, पुष्प, फळ, पाणी…
वस्तू नाही महत्त्वाची.
भाव आहे.
भगवंत हा भाव आहे.
आणि भगवंत हा ‘होता’ आहे.
हा विचार फक्त ध्यानासाठी नाही.
हा विचार समाजासाठी आहे.
राजकारणासाठी आहे.
अर्थशास्त्रासाठी आहे.
हा विचार स्वीकारला,
तर मालकी कोसळेल.
हक्क विरघळतील.
आणि कर्तव्य उभं राहील.
चातुर्वर्ण्य कोसळलं
कारण सिद्धांत विसरले गेले.
आकार उरला,
आत्मा गेला.
आज दिसणारी व्यवस्था
उडवलीच पाहिजे.
कारण ती विकृत आहे.
पण मूळ तत्त्व—
ते अजूनही शुद्ध आहे.
“श्रमाचे मूल्य नाही”—
हा विचार आळसासाठी नाही.
तो कर्तव्यासाठी आहे.
करणं अपरिहार्य आहे.
कारण होता थांबत नाही.
तो करतच राहतो.
तू कर्म कर.
फळ सोड.
प्रसाद स्वीकार.
कारण करणारा तू नाहीस.
आणि भोगणारा सुद्धा तू नाहीस.
आत्मा ‘होता’ आहे.
हे एक वाक्य समजलं,
तर शंभर ग्रंथ निरर्थक होतील.
पुन्हा पुन्हा चिंतन कर.
कारण हे ज्ञान नाही—
हे विस्मरणातून बाहेर पडणं आहे.
आणि जेव्हा हे उमगेल,
तेव्हा हवन मंदिरात राहणार नाही.
ते समाजात उतरेल.
Comments
Post a Comment