मृत्युंजयतेचा चैतन्ययोग
जीवन - भगवान = शून्य.
हा सूत्रविचार फक्त गणित नाही, तर संपूर्ण अध्यात्म आहे. माणूस स्वतःला जगवतो असा आपला गैरसमज आहे. पण खरं पाहिलं तर तो फक्त जगण्यात सहभागी असतो, संचालक नाही. कारण जीवनाचं सूत्र आपल्या हाती नाही, ते परमचैतन्याच्या हाती आहे.
भगवंत माझ्यासोबत आहे — एवढं जाणवलं, की जगणं तत्क्षणी चैतन्यमय होतं. मग कोणतीही अवस्था असो — बाल्य, तारुण्य, वा वार्धक्य; प्रत्येक क्षण प्रसन्नतेने उजळतो. संपत्तीतही चैतन्य दिसतं आणि विपत्तीतही चैतन्याची जाणीव होते. मरणसुद्धा मग मृत्यू राहत नाही, तर जीवनाचा पुढचा टप्पा ठरतो.
लोक विचारतात — “मरणाच्या वेळी आपली काय अवस्था होईल?”
अरे, ज्याने तुला या जगात आणलं, त्याच्याकडे तुला घेऊन जाण्याचं सामर्थ्यही आहे. मग का चिंता करतोस? भगवंत कधीच वेदनांनी माणसाला संपवत नाही. तो हसत हसत जन्म देतो, हसत हसत जगवतो आणि हसत हसतच परतीचा प्रवास घडवतो.
जीवनाच्या प्रत्येक क्षणात चैतन्य पाहणारा मनुष्य मृत्युंजय होतो.
कारण मृत्यू त्याच्यासाठी भय नाही, तर मुक्तीचा उत्सव असतो.
ज्याला हे समजलं तो मृत्यूला वश करतो; ज्याला नाही समजलं, तो विश्वाच्या शिखरावर पोहोचूनही रडत राहतो.
जगातली प्रत्येक भीती माणसाच्या "भगवंतविस्मृतीतून" जन्म घेते.
मृत्यूची भीती म्हणजे त्या विस्मृतीचा परमोच्च बिंदू.
पण ज्या क्षणी माणूस म्हणतो — “भगवंत माझ्यासोबत आहे”, त्या क्षणी सगळ्या भीती नाहीशा होतात.
तो श्रीखंड खातो तेव्हा श्रीखंड गोड लागतं,
तो दु:खात असतो तरी अंतर्मनात प्रसन्नतेचा झरा वाहतो.
मृत्युंजय होण्यासाठी काही साधनांची गरज नाही,
फक्त एक जाण — “मी चैतन्य आहे, हे शरीर नव्हे.”
ही जाण ज्याला मिळाली तो खऱ्या अर्थाने “मृत्युंजयतेचा चैतन्ययोगी” होतो.
Comments
Post a Comment