भवसागर आणि निर्भयता
भवसागर — हा शब्द ऐकताच आपल्या मनात एक भीतीचं चित्र उभं राहतं. अंत न दिसणारा सागर, त्यात उठणाऱ्या लाटा, त्याचं खोल अंधारमय पाणी — आणि आपण त्यात बुडण्याच्या भीतीने थरथरत उभे. अनेक तथाकथित अध्यात्मिक लोकही हीच भीती मनात बाळगून जगतात. त्यांना वाटतं, या भवसागरात पडू नये म्हणून चेहरा गंभीर ठेवणं, हसणं बंद करणं, उपवास करून देह कृश करणं — हेच अध्यात्म.
पण खरं पाहता, अध्यात्म म्हणजे भीतीचा नाश आणि आनंदाचा जन्म.
भगवंताने आपल्याला भीती देण्यासाठी नाही, तर मुक्ततेसाठी हा प्रवास दिला आहे.
पंढरीचा विठ्ठल हात कमरेवर ठेवून उभा आहे. ती मुद्रा म्हणजे आत्मविश्वासाची, निर्भयतेची आणि सोबतीची जाणीव देणारी मुद्रा आहे. तो सांगतो —
"भवसागराची तू भीती बाळगू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. तू माझा झालास म्हणजे तुझ्यासाठी हा सागर कमरेइतकाच आहे."
किती गहिरा अर्थ आहे या मुद्रेत!
भवसागर म्हणजे जीवनातील संकटं — पण जो भगवंताचा झाला तो त्या संकटांकडे घाबरून पाहत नाही, तो त्यातून जातो, जसा बाप मुलाला घेऊन पाण्यात उतरतो.
बापाला पोहायला येतं, त्यामुळे मुलाला बुडण्याची भीती नसते.
मुलाच्या तोंडात पाणी जाणार नाही, याची खबरदारी बाप घेतोच. उलट त्या पाण्यात बापाच्या हातावर तरंगताना मुलाला आनंदच वाटतो.
अध्यात्म म्हणजे हेच — भयाच्या जागी विश्वास ठेवणं.
'मामकानाम्' — म्हणजे ‘जे माझे झाले आहेत.’
भगवंत म्हणतो, “जे माझे झाले आहेत, त्यांच्यासाठी भवसागर कमरेपर्यंतच आहे.”
हे वचन केवळ सांत्वन नाही; ते जीवनदृष्टी आहे.
जोपर्यंत आपण "मी कोणाचा?" हा प्रश्न सोडवलेला नाही, तोपर्यंत सगळं भयकारक वाटतं.
पण एकदा आपण “मी भगवंताचा” असं निश्चयाने म्हटलं की, मग भयाचं कारणच संपतं.
भवसागरात बुडण्याची भीती त्यांनाच वाटते, जे अजूनही ‘मी एकटा आहे’ या समजुतीत अडकले आहेत.
पण जो विठ्ठलाच्या कटेवरी हातात स्वतःला सोपवतो, तो तरंगत जातो.
तो हसतो, खेळतो, गातो — आणि त्या खेळातच त्याची मुक्ती दडलेली असते.
निर्भयतेचा मंत्र हा एवढाच:
“भवसागराचा गाभा भीतीत नाही, तर विश्वासात आहे.”
जेव्हा ‘तो’ आपल्या सोबत आहे, तेव्हा हा सागर फक्त कमरेइतकाच वाटतो.
Comments
Post a Comment